LIC ची ‘न्यू जीवन लक्ष्य’ योजना: कुटुंबाचे भविष्य आणि आर्थिक उद्दिष्टे सुरक्षित करण्याचा उत्तम मार्ग

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन आणि फायदेशीर योजना सादर करत असते. यामध्ये ‘न्यू जीवन लक्ष्य’ ही योजना अत्यंत लोकप्रिय असून या योजनेचा मुख्य गाभा तिच्या नावातच दडलेला आहे; म्हणजेच एखाद्या व्यक्तीने आपल्या भविष्यातील आर्थिक ध्येयांसाठी या योजनेची निवड केली असेल, तर ते ध्येय कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होईल याची खात्री ही पॉलिसी देते. ही योजना इतर पारंपरिक विमा योजनांच्या तुलनेत वेगळी ठरते, कारण यामध्ये केवळ विमा संरक्षणच नाही तर कुटुंबाच्या भविष्यातील गरजांची शाश्वती देखील दिली जाती.

या योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिचा ‘डेथ बेनिफिट’ किंवा मृत्यू पश्चात मिळणारे लाभ. सामान्यतः विमा योजनांमध्ये विमाधारकाचा मृत्यू झाल्यास पॉलिसी बंद होते आणि वारसदाराला विम्याची रक्कम दिली जाते, परंतु ‘न्यू जीवन लक्ष्य’ पॉलिसीमध्ये तसे होत नाही. जर पॉलिसीच्या मुदतीदरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाला, तर ही पॉलिसी बंद न होता सुरूच राहते. अशा परिस्थितीत कुटुंबाला तात्काळ विम्याच्या रकमेच्या १०% रक्कम दरवर्षी नियमित उत्पन्न म्हणून मिळू लागते आणि भविष्यातील सर्व प्रीमियम किंवा हप्ते माफ केले जातात. इतकेच नाही तर पॉलिसीची मुदत संपल्यानंतर वारसदाराला मॅच्युरिटीची पूर्ण रक्कम देखील दिली जाती, ज्यामुळे विमाधारकाने आपल्या कुटुंबासाठी पाहिलेले स्वप्न किंवा निश्चित केलेले लक्ष्य अपूर्ण राहत नाही.

‘न्यू जीवन लक्ष्य’ ही एक ‘नॉन-लिंक्ड’ योजना आहे.  याचा अर्थ असा की यातील गुंतवणूक शेअर बाजारातील चढ-उतारांवर अवलंबून नसते आणि त्यामुळे गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित राहते. तसेच, हा एक ‘लिमिटेड प्रीमियम पेमेंट’ प्लॅन आहे, ज्यामध्ये विमाधारकाला त्यांनी निवडलेल्या पॉलिसीच्या मुदतीपेक्षा ३ वर्षे कमी काळ हप्ते भरावे लागतात. उदाहरणार्थ, जर एखाद्याने २५ वर्षांची मुदत निवडली असेल, तर त्याला केवळ २२ वर्षेच हप्ते भरावे लागतात, मात्र विमा संरक्षण पूर्ण २५ वर्षांपर्यंत कायम राहते. याशिवाय, एलआयसी आपल्या नफ्यातील हिस्सा ‘बोनस’ स्वरूपात विमाधारकासोबत शेअर करते, ज्यामुळे मॅच्युरिटीच्या वेळी मिळणारी रक्कम मोठी असते.

या पॉलिसीमध्ये प्रवेश करण्यासाठी किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ५० वर्षे निश्चित करण्यात आले आहे. पॉलिसीची मुदत १३ ते २५ वर्षांच्या दरम्यान निवडता येते आणि किमान विमा रक्कम (Sum Assured) २ लाख रुपये असणे आवश्यक आहे, तर कमाल रकमेवर कोणतीही मर्यादा नाही. अधिक संरक्षणासाठी विमाधारक यामध्ये ‘अपघात मृत्यू आणि अपंगत्व लाभ’ (Accidental Death and Disability) किंवा ‘न्यू टर्म इन्शुरन्स’ यांसारखे रायडर्स देखील अतिरिक्त प्रीमियम भरून जोडू शकतात.

उदाहरण म्हणून पाहायचे झाल्यास, जर ३० वर्षीय मनोज यांनी २० लाख रुपयांच्या विम्यासाठी २५ वर्षांची मुदत निवडली, तर त्यांना २२ वर्षांपर्यंत वार्षिक साधारण ८२,२४८ रुपये हप्ता भरावा लागेल. त्यांच्या हयातीत पॉलिसी पूर्ण झाल्यास त्यांना सुमारे ५२ लाख रुपये मॅच्युरिटी म्हणून मिळू शकतात. मात्र, दुर्दैवाने पाचव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या वारसदाराला पुढील २० वर्षांपर्यंत दरवर्षी २ लाख रुपये (विम्याच्या रकमेचे १०%) मिळतील आणि २५ व्या वर्षी सुमारे ५४ लाख रुपयांचा मॅच्युरिटी लाभ देखील दिला जाईल.

या पॉलिसीमध्ये ग्राहकांच्या सोयीसाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत. प्रीमियम भरण्यासाठी ३० दिवसांपर्यंतचा सवलतीचा काळ (Grace Period) मिळतो. तसेच, एक वर्षाचा हप्ता भरल्यानंतर ग्राहक या पॉलिसीवर कर्ज घेऊ शकतात किंवा गरज पडल्यास पॉलिसी सरेंडर करू शकतात. जर काही कारणास्तव पॉलिसी बंद पडली असेल, तर ती ५ वर्षांच्या आत पुन्हा सुरू करण्याची (Revival) सोय देखील उपलब्ध आहे. कर बचतीच्या दृष्टीनेही ही योजना फायदेशीर असून, यामध्ये भरलेला प्रीमियम आयकर कलम ८० सी अंतर्गत आणि मिळणारी मॅच्युरिटी रक्कम कलम १० (१० डी) अंतर्गत पूर्णपणे करमुक्त असते. एकूणच, कुटुंबाचे आर्थिक भविष्य कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरक्षित ठेवू पाहणाऱ्यांसाठी ही योजना एक उत्तम पर्याय ठरते.

Leave a comment