पुणे(प्रतिनिधि)–नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा, अशी महाविकास आघाडीकडे मागणी करणाऱया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राठोड यांचा राजीनामा का घेतला नाही. मलिक अल्पसंख्यांक असल्यामुळे फडणवीस यांची भूमिका बदलली का, अशी विचारणा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. फडणवीस यांना उशिरा विवेकवाद कसा आठवला, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
याबाबत बोलताना अंधारे म्हणाल्या, अजित पवार आणि नवाब मलिक यांच्यामध्ये दोन ते तीन भेटी झाल्या होत्या. मात्र मलिक यांचा विषय काढण्यामागील राजकारण वेगळे आहे. अधिवेशनात मराठा आरक्षण, धनगर आरक्षणावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे. मात्र, मलिक प्रकरणावर पुढील तीन ते चार दिवस चर्चा होईल. सत्तेपेक्षा देश मोठा, हा विवेकवाद फडणवीस यांना उशिरा सुचला आहे. भावना गवळी, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रिफ यांची निर्दोष मुक्तता झालेली नाही. तरीही ते सत्तेत महत्त्वाच्या पदावर आहेत. मनोज कंबोजसारखी व्यक्ती पुढे केली जाते. त्यावेळी फडणवीस यांचा विवेकवाद कुठे जातो, अशी टीका अंधारे यांनी केली.
कारागृह, महानिरीक्षकांवर सरकारने कारवाई करावी
ससूनमधील अमली पदार्थ तस्करीप्रकरणी काहींना अटक झाली आहे. कारागृहातून या अवैध कृतीला बळ दिले जात होते. त्यामुळे कारागृह निरीक्षक, महानिरीक्षक यांच्यावर सरकारने कारवाई करावी, अशी मागणीही अंधारे यांनी या वेळी केली